Tuesday 30 August 2011

जव्हारवारी

सध्या सर्वत्र दमदार पाऊस कोसळतोय. या पावसात भिजायची मजा काही औरच असते. मनसोक्त भिजायला भटक्या मंडळींची पावलं अ
नेक स्पॉटसकडे वळत असतात. ठाणे जिल्ह्यातलं जव्हार हे असंच एक मस्त ठिकाण. तुफान कोसळणारा धबधबा, अप्रतिम निसर्गसौंदर्य अनुभवायला इथे जरुर भेट द्यायला हवी.

........

जव्हार हा खरं तर महाराष्ट्रातला काहीसा दुर्लक्षित, दुर्गम असा भाग. पण, पावसाळ्याच्या दिवसांत इथलं वातावरण मनाला अक्षरश: वेड लावतं. दाट धुकं, थंड हवा, तुफान कोसळणारा पाऊस असं धुंद वातावरण वातावरण इथे पावसाळ्याच्या दिवसांत अनुभवायला मिळतं. जव्हारला 'महाराष्ट्रातलं चेरापुंजी' अशी उपमा देण्यास हरकत नाही. अप्रतिम निसर्गसौंदर्याचं वरदान जव्हारला लाभलं आहे. खळाळणारं पाणी, फेसाळत्या पाण्याचे धबधबे, हिरवीगार वनराई हे अनुभवायचं असेल तर इथे येण्याला पर्याय नाही. जव्हारमध्ये प्रवेश करताच अंदाजे ४०० मीटर्स खोली असलेली नारळीदरा ही दरी पहायला मिळते. त्यात अनेक छोटे-मोठे धबधबे वहात असतात. जव्हारचा हनुमान पॉइण्ट तर प्रसिद्धच आहे. तिथे उभं राहून सभोवताली नजर टाकल्यास निसर्गसौंदर्याचा नजराणाच तुमच्यासमोर खुला होतो. अतिशय उत्कृष्ट असा हा व्ह्यू पॉइण्ट आहे. याशिवाय सूर्यास्त पाहण्यासाठी इथला सनसेट पॉइण्ट प्रसिद्ध आहे.

जव्हारचं मुख्य आकर्षण म्हणजे इथला प्रचंड असा दाभोसा धबधबा. तुफान वेगाने कोसळणारं पाणी पाहून अंग शहारतं. जवळपासच्या २०० चौरसकिलोमीटर्सच्या परिसरात इतका मोठा धबधबा दिसणार नाही असं इथली स्थानिक मंडळी छातीठोकपणे सांगतात. या धबधब्यातल्या पाण्याचे तुषारच सुमारे १०० फूट उंचीपर्यंत उडत असतात. त्यात भिजणं म्हणजे अहाहा... या धबधब्याशिवाय इथे हिरडपाडा धबधबाही आहे. अलीकडेच बांधण्यात आलेलं खडखड धरण लोणावळ्यातल्या प्रसिद्ध भुशी डॅमची आठवण करून देतं. जोरदार पावसाने हे धरण भरुन वाहू लागलं की त्या पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटता येतो. पाण्यात भिजण्यासाठी तिथे खास पायऱ्याही बांधण्यात आल्या आहेत. जव्हारपासून सुमारे ६ ते ७ किलोमीटर्सवर हे धरण आहे. इथली आदिवासी आणि वारली संस्कृती प्रसिद्ध आहे. चिंब भिजून कडकडून भूक लागली की इथली गरमागरम नागलीची भाकरी आणि त्यासोबत उडदाचं भुजा खाण्यातला आनंद म्हणजे केवळ अवर्णनीय.

कसं जाल?

मुंबई-अहमदाबाद हायवेवरुन निघाल्यास मनोरच्या मस्ताननाक्याजवळून जव्हारला जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याने विक्रमगड आणि तिथून जव्हारला पोहोचता येतं. याशिवाय भिवंडीहून वाडा-विक्रमगड करून जव्हारला पोहोचता येतं. रेल्वेने जायचं असल्यास पश्चिम रेल्वेच्या पालघर आणि डहाणू रेल्वेस्टेशनहून जव्हारला जाणाऱ्या बस सुटतात. शिवाय ठाणे-कल्याणहूनदेखील जव्हारला जाणाऱ्या बस आहेत. जव्हारमध्ये राहण्यासाठी काही हॉटेल्सची व्यवस्था आहे.

Dahanu Mahalaxmi Yatra

Find us on Facebook